मराठा शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांचे आदेश
By Kanya News||
सोलापूर : मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्याच्या आग्रही मागणीसाठी मराठा समाज आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधवाचा बुधवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून परवानगी दिलेल्या मार्गावरुन शांतता रॅली काढणार काढण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश पारित केला आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान लाखोंच्या संख्येने समाज बांधव एकत्रित जमा होऊन शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर सभा होणार आहे. त्यानंतर सरस्वती चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधव जाणार आहेत. त्य़ामुळे या मार्गावर लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होणार आहे. रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अंडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते रात्रौ २२ वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास बंद करण्यात आलेला आहे. या शांतता रॅली कार्यक्रमासाठी इतर जिल्हयातूनही मोठया प्रमाणात लोक येणार आहेत. त्यामुळे लोकांची होणारी गर्दी व शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताता नाकारता येत नसल्याने सर्व शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षण संकुल, संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा न्याय दंडाधिकारी यांनी दिलेले आहेत.