पिक विम्याचा वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचे

नुकसान भरपाईचे पैसे विमा कंपनीने त्वरित द्यावेत

by assal solapuri |

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२३ अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख १३ हजार ५६३ इतकी असून, या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी राहुल गायकवाड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, पूर्वीचे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२३ अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यापैकी २५ हजार ७१ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा झालेली आहे. तरी उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम शासन निर्णयात नमूद तरतुदीच्या अधीन राहून जेवढ्या शेतकऱ्यांचे शक्य आहेत, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. विमा कंपनीने बऱ्याच ठिकाणी पीक नुकसानीचा पंचनामा न करता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे नाकारलेले आहेत, हे चुकीचे असून, विमा कंपनीने नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे त्यांनी निर्देशित केले.

कृषी विभागाने पीक विमा कंपनीच्या अहवालाची व्यवस्थित माहिती घेऊन आजच्या बैठकीचे संदर्भ देऊन ज्या शेतकऱ्यांना या अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते, त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अहवाल विमा कंपनीला पाठवावा. विमा कंपनीने त्यांच्या स्तरावरून याबाबत पुढील कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, यासाठी सकारात्मक रहावे, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.

  • प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  गावसाने यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ नुकसान भरपाईची सद्यस्थिती बैठकीत मांडली. यामध्ये हंगाम मध्य प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई वाटप हे जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार ७५० शेतकऱ्यांना ११५ कोटी झालेले असून, १३ हजार ५३३ शेतकऱ्यांना ९३ लाख रुपये मिळणे बाकी असल्याचे सांगितले.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक पंचनामे आधारित नुकसान भरपाई २५ हजार ९५४ शेतकऱ्यांची झालेली होती. यानुसार २४ हजार ७७२ शेतकऱ्यांना २४ कोटी ३३ लाखाचे वाटप झाले. काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत २१ हजार ३८४ पूर्व सूचनापैकी १४ हजार  ४५४ पंचनामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी ३३१३ शेतकऱ्यांना आजअखेर एक कोटी ९६ लाखाचा निधी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact