ॲड. राजपूत सरांचे गरीब-वंचित घटकांना न्याय
देण्यासाठी फार मोठे योगदान : ॲड. अमित आळंगे
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग मोहनसिंग राजपूत यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. त्यावर मात करीत ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सन १९९६’ पासून वकिली व्यवसायास सुरूवात केली. सोलापूर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व खजिनदार म्हणून त्यांनी काम पहिले. शिक्षेचे प्रमाण वाढवण्यात अभुतपूर्व यश मिळवले.सहा वर्षाच्या जिल्हा सरकारी वकील कार्यकाळात १०० आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी विक्रम केला. सोलापूर बार असोसिएशनची नावलौकिकता वाढवली.वकिली व्यवसायासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जिल्हा सरकारी वकील यांनी गुन्हे अन्वेषणाच्या क्षेत्रात नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.वकिली व्यवसायासोबत दयानंद विधी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना देखील त्यांनी घडविण्याचे काम केले. त्यांच्या कार्याचा दखल घेवून व वकिली व्यवसाय करणाऱ्या बंधू-भगिनींनी प्रेरणा मिळावी या उद्देशाने सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सदरचा सन्मान सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे, उपाध्यक्ष ॲड. व्ही.पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज पामूल, खजिनदार ॲड. विनय कटारे यांच्यावतीने करण्यात आला.
सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे म्हणाले, जिल्हा सरकारी वकील ॲड. राजपूत सरांचे गरीब-वंचित घटकांना न्याय देण्यासाठी फार मोठे योगदान लाभले आहे. आजतागायात असंख्य विद्यार्थी घडवणारे सामाजिक जाण असणारे राजपूत सरांचा सत्कार करताना आम्हास आनंद होत आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ ॲड. महेश अग्रवाल, ॲड. व्ही.एस. आळंगे, ॲड. शैलजा क्यातम यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठविधीज्ञ ॲड. महेश अग्रवाल यांनी राजपूत सरांच्या हातून अशीच देशसेवा व समाजसेवा घडावी अशी शुभेच्छा दिली.
ज्येष्ठविधीज्ञ ॲड.व्ही.एस.आळंगे यांनी राजपूत सरांनी सोलापूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात लौकिक केले व समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे सांगितले.साह्य. सरकारी वकील ॲड. शैलजा क्यातम म्हणाल्या, अतिशय प्रतिकूल परिस्थित सरांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी अन्याय झालेल्या कुटुंबाना न्याय देण्याचे काम केले.
सत्काराला उत्तर देताना जिल्हा सरकारी वकील राजपूत म्हणाले, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हानाशी लढलो व प्रामाणिकपणे काम करीत राहिलो. म्हणूनच मला समाजातील अन्याय झालेल्या कुटुंबांना न्याय देता आले. ज्या कुटुंबात माझ्या वकिली व्यवसायास सुरुवात केली, त्या कुटुंबाने म्हणजेच सोलापूर बार असोसिएशनने माझ्या कार्याची दखल घेऊन माझा सन्मानपत्र देऊन गौरव केला, म्हणून सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व वकील बांधवांचे आभार.
सदर कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हिरालाल अंकलगी, ॲड. सुनिल शेळगीकर, ॲड. खतीब वकील, ॲड. लक्ष्मण मारडकर, साह्य. सरकारी वकील ॲड. माधुरी देशपांडे, ॲड. अल्पना कुलकर्णी, ॲड. बुजरे, ॲड.शीतल डोके, ॲड. प्रकाश जन्नू, ॲड. आनंद कुर्डुकर, बागल यांच्यासह असंख्य वकील बंधू- भगिनी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात सन्मान पत्राचे वाचन खजिनदार ॲड. विनय कटारे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव ॲड. मनोज पामूल, आभार प्रदर्शन सह सचिवा ॲड. निदा सैफन यांनी केले.