प्रधानमंत्री पिक विमा योजना: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
दत्तात्रय गावसाने यांचे आवाहन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जिल्ह्यात दि. २८ ऑगस्ट ते दि. २ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सूरू असून, अजून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन पिकाचे नुकसान झालेले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस ७२ तासामध्ये कळवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२४ या हंगामासाठी अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी खरीप २०२४ मध्ये ओरियंटल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिक विमा योजनेतर्गत खरीप २०२४ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे.
नुकसानीबाबतची सूचना पिक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पिक विमा ॲप अथवा कृषी रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक १४४४७ या क्रमांकाचा वापर करावा. या क्रमांकाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी, बँक कृषी व महसूल विभाग यांना द्यावी, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.