-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची भरती
-
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन
- महास्वयंम पोर्टलवर सर्व शासकीय आस्थापनानी नोंदणी करून त्यांना मंजूर असलेल्या पदाच्या 5 टक्के तर खाजगी आस्थापनांनी 10 टक्के पदे सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी त्वरित भरण्याची कार्यवाही करावी
- By Kanya News||
- सोलापूर : राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे. ही योजना राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना असून, सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाने त्यांच्या आस्थापनेवरील सर्व मंजूर पदाच्या पाच टक्के पदे तर खाजगी आस्थापनानी त्यांच्या मंजूर पदाच्या दहा टक्के पदे या योजनेअंतर्गत भरून त्यांना सहा महिने प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करावयाच्या आहे. तरी दि. १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी सर्व आस्थपनांनी ही पदे भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
- नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत शासकीय विभाग प्रमुख व खाजगी उद्योजक यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने अन्य शासकीय विभाग प्रमुख व किर्लोस्कर बालाजी अमाईन यांच्यासह अन्य खाजगी उद्योगाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
-
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले..
-
जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्याकडील मंजूर पदाच्या पाच टक्के पदे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत त्वरित भरण्याची कार्यवाही करावी. प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या संबंधित प्रशिक्षणार्थी यांना पुढील सहा महिने त्यांना आपल्या कार्यालयात विविध ठिकाणच्या कामाचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करावयाचे आहे. त्यासाठी महास्वयम पोर्टलवर आपल्या कार्यालयाची नोंदणी करून पदाची मागणी करावी किंवा वृत्तपत्रात जाहिरात देऊन इच्छुक उमेदवारांना बोलावून त्यांचे वॉक इन इंटरव्ह्यू व त्वरित घेण्याची कार्यवाही करून त्यांना तत्काळ आदेश देऊन कार्यालयात रुजू करून घेण्याचे सूचना त्यांनी केली.
-
तर जिल्ह्यातील खाजगी आस्थापना उद्योजक यांनी त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग फिल्डमध्ये काम करणाऱ्या एकूण पदाच्या दहा टक्के तर सर्विस सेक्टर मधील एकूण पदाच्या २० टक्के पदे या योजने अंतर्गत महास्वयम पोर्टलवर नोंदणी करून आपल्या आस्थापनेमध्ये नियुक्त करून घेऊन त्यांना विविध कामाचे प्रशिक्षण द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
-
प्रारंभी निवासी उप जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी या योजनेअंतर्गत उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण द्वारे रोजगार क्षम करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे सांगून या योजने करिता संपूर्ण राज्यासाठी ५५०० कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या योजनेची अंमलबजावणी यंत्रणा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य हे असल्याचे त्यांनी सांगितले.
-
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः उद्द्योजकांना त्यांच्या उद्द्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
- ठळक वैशिष्टे:-
- बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक मेदवार. https://rojgar mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी- https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील, सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्यात येईल.
- आस्थापना/उद्द्योजकासाठी पात्रता-
- आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नौदणी केलेली असावी. नाविन्यता विभागाच्याआस्थापना / उद्द्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी,आस्थापना / उद्द्योगानी इपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, डीपीआयटी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.
- उमेदवारांची पात्रताः-
- उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युतर असावी. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
- शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल.
- बारावी पास उमेदवारासाठी प्रतीमहा सहा हजार रुपये, आय टी आय /पदविकासाठी आठ हजार रुपये तर पदवीधर किंवा पदव्युत्तरसाठी दहा हजार रुपये प्रतिमहा रुपये विद्यावेतन असणार आहे.
- अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र अथवा (हेल्पलाईन क्रमांक- १८००१२०८०४० किंवा ०२१७- २९९२९५६) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.