बंदमध्ये सर्व नागरिकांना सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन

 by assal solapuri ||

सोलापूर :  सध्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहेत. बदलापूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. बदलापूर येथील  घटनेचा महाविकास आघाडीच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. महिला, मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महिला व मुलींचे संरक्षण करण्यात  महायुती सरकार असमर्थ ठरले  आहे. या असंवेदनशील सरकारच्या विरोधात  महाविकास आघाडीच्यावतीने शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे,अशी माहिती महाविकास आघाडीच्यावतीने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि माकपचे माजी आमदार आदम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या बंदमध्ये सर्व नागरिकांना सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श  विद्या मंदिरात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुमुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या अमानवी कृत्याच्या  विरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. ज्या शाळेत या अत्याचाराची घटना घडली ती शाळा  सत्ताधारी लोंकाशी संबधित असल्याने पोलीस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांना त्या गरोदर मातेला अकरा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आहे. सदरची घटना ही पोलीस आणि सरकारच्या गलथान कारभाराचे आणि  संवेदनशीलतेचे ज्वलंत उदाहरण आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयातच माता- भगिनी, महिला सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कशी असेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दि. २० ऑगस्ट रोजी या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बदलापूरमध्ये आंदोलन केले.  रेलरोको केला. पण सरकाराकडून मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला.  स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला नाईलाजाने कारवाईला सुरूवात करावी लागली.

राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार सुरू आहे. सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिलेले नाही. महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बदलापूरचा या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. तरी सोलापूर शहरातील नागरिक, बंधू-भगिनी आणि दुकानदार, व्यापारी वर्गांनी  या  महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे.  महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सदरचे  बंद यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. या पत्रकार परिषदेस  अॅङ यू.एन. बेरिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, दिलीपभाऊ कोल्हे, प्रताप चव्हाण,दत्तात्रय वानकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact