जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद यांनी आदेश केले निर्गमित

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर येथील कावळे, घार व बगळा  या पक्षांमध्ये अनैसर्गिक मरतूक होती, म्हणून दि. १० मार्च २०२५ रोजी त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील लॅबला  पाठविण्यात आलेले होते. सदरचे नमुने बर्ड फ्लू (H5N1) लक्षणे असल्याचे आढळून आल्याने  हा परिसर  सतर्कता भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत.

सदर ठिकाणच्या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता करता येत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक  आहे. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सदर परिसरातील येथील दहा किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग  घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.

बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर शहरातील दोन्ही बाधित परिसरांची २ टक्के सोडियम हायपोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट  निर्जंतुकीकरण करावे. चुन्याची फक्की मारावी. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर त्रिजेतील कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवावेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर यांची आवश्यकतेनुसार महानगरपालिका आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, बांधकाम विभाग व परिवहन विभाग इत्यादी विभागावी आवश्यक मनुष्यबळ यंत्र व साधनसामग्री पुरवठा करावा.

पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, वन विभाग, जलसंपदा व परिवहन विभाग इत्यादी विभागांनी प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९, बर्ड ब्ल्यू रोग प्रतिबंध नियोजन व रोगप्रसार रोखणे कृती आराखडा (सुधारित) २०२१ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व सात रोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील बाधित क्षेत्र येथून ० ते १ किलोमीटर त्रिजेच्या बाधित क्षेत्रात व १ ते १० किलोमीटर त्रिज्येच्या सर्वेक्षण क्षेत्रात कार्यवाही करावी.पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्षांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत. अहवाल प्राप्त करून घ्यावा. आवश्यतेनुसार मृत पक्षांची विल्हेवाट शास्रोक्त पद्धतीने लावण्याकरिता किमान तीन फुट खोल खड्‌डा करून त्यामध्ये चूना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करण्यात यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.  या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा, असे आदेशही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशिर्वाद यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact