उजनी, वीर धरणाचा विसर्ग वाढला; सतर्कतेचा इशारा

by kanya news ||

सोलापूर :  उजनी आणि वीर धरणाचा विसर्ग वाढला आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने उजनीकडे येणारा दौंडचा विसर्ग वाढला आहे. उजनीच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने त्यातून पाणी सोडण्यात येत असून, भीमा नदीचा विसर्ग वाढला आहे. उजनीतून भीमा नदीत २१ हजार क्युसेक्स पाणी सोडले आहे.

शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ५ वाजता वीर धरण १०० टक्के भरले आहे. पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाटघर व निरा देवघर धरणातून विद्युत गृहाद्वारे विसर्ग सुरू असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येदेखील पाऊस पडत आहे. वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या  कालव्याच्या अतिवाहकाद्वारे  ३५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेवला.  निरा उजव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ५३८४७ क्युसेक्स  विसर्गामध्ये वाढ करून ६१९२३ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात येत आहे. आता निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग ६३२७३ क्युसेक्स असणार आहे.

पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *